भिंगरी_“द_रिव्हेंज”_(भाग २)




जयाने आवंढा गिळला, बिगलेल्या मुलाचे झपा झप मुके घेतले, अरुण जरा गोंधळात पडला, येव्हाना माय असं काही करत नाय ह्या विचाराने तो मायच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला,

"माय काय झालं वं, तू बरी हायस ना?"

स्वतःला जरा सावरलं जयाने, मुलांना बाजूला केलं, हातात टांगून असलेला झोरा पुढं जावून समोरच्या भिंतीला टांगला. गप्प राहूनच ती नाह्नी कडे पाय धुवायला वळली,  धूतच म्हणाली,

"अरुण, खिचडी आणली होती काय रे लायनीसाठी?”

अरुणला कलालं होतं कि माय उत्तर टाळत हाय ते. तो तिच्या माग मागं फिरत होता, तर ती परत म्हणाली,

“काय रे बाळ्या, आणली होतीस ना खिचडी?”

आता मायचा नेहमीचा स्वर ऐकून अरुणला बऱ वाटलं आणि त्याने तिच्या मागे फिरणं बंद केलं. तो भावना जवळ जावून बसला आणि म्हणाला, “हो वं माय, माह्या लाडाच्या बहिणिले काय उपाशी ठेवून वाटलं तुले. तू बी ना..काय बिन बोलतस.”

“हो रे माझ्या राज्या, असाच बहिणीची काळजी घे रे माह्या लेका. तिले तरी कोण हाय तुझ्या शिवाय, माह्या बाद. चल हात पाय धुवा बऱ म्या कण्या वरून देतो आता. खा आणि झोपा बऱ."

अरुण कुतूहलाने म्हणाला, ."आई उद्या बी रायल न कण्या सकाळसाठी."

आईने त्याच्या गालाला हात लावला, ."उद्या ची उद्या, आज खाऊन झोपा, उद्या पासून तुमचं तुमालेच बघायचं हाय."

"माय, काहून असं बोलतं हायस वं, म्या तुले आल्यापासून पाहून रायलो."

"काही नाही रे..खिचडी नाही का आणत  तू शाळेमधून अन खातस बिन... म्हणून म्हटलं, उद्या मले लय लवकर जायाच हाय. अन कधी येल मी माझं मले बिन माहित नाही राज्या. मग तुलेस पायाव लागल ना लायनिले." 

जया विचार करत कण्या वारण्यात मागे व्यस्त झाली, दोघही खेळायला लागली, आणि पोटभर कण्या खायच्या आहे म्हणून आनंदात होती. त्यांचा तोच नेहमीचा खेळ सुरु झाला अरुण भिंगरी फेकत होता, आणि गाणं म्हणत होता आणि भावना टाळ्या वाजवत उड्या मारत आनंदाने  त्या गाण्यावर नाचत होती.

“एक होती भिंगरी...एक होती भिंगरी ..तिचं नावं झिंगरी,..तिचं नावं झिंगरी....”

जयाने काड्या उचल्या आणि चुलीकडे वळली, येतांना तिने पावं भर गहू आणले होते चोरून जवळच्या शेतातून उपुरून, शेतधनी ओरडला मग धावतच घरापर्यंत पोहचली होती. पांधीतून धवतांना हातावर तुरीच्या झाडाच्या दांड्या ओरबडल्या होत्या, पण तिला कुठे भाण होतं. मुलं दिसत होती समोर उपाशी तिची वाट बघत.

कण्या बनवत विचारात पडली, दुपारचा सारा प्रसंग डोळ्यासमोर आला. मिरची मालकाने तिला गोदामात बोलावलं होतं कारण तिने सकाळी ऍडव्हान्स म्हणून जास्तीचे पैसे मागितले होते. ती गोदामात जाताच मालकाने शंबर रुपये समोर ठेवले, जयाचा चेहरा फुलला होता, समोर ते शंभर रुपये पाहून. जयाने हात लावताच तिचा हात पकडत तिला स्वतः कडे ओढलं मालकाने. दोघात खेचा-खिची झाली, जयाने ताडकन तिथेच ठेवलेला गडू घेतला आणि आदळला मालकाच्या टाळक्यावर, आणि निघाली तिथून धावत कामासाठी. मालकाने तिला जातांना धामिकी दिली,

"जा, कसं काम करतं ना! पायतो म्या आता तुले मोठी सती सावित्री आहेस काय वं, नवरा तर नाय तुले कसे मोठे करशील पोरं....नुसत्या मिरच्या तोडून काय होणार ह्या तुवं वालं, माजली साली. जाशील कुठं वं.”  

ती स्वतः ला सोडवत धावत सुटली, ठेकेदाराजवळ गेली,

"ये दादा, माह्या अतातोवर कामाचे पैसे दे बाबा, जायचं माले, पोरं उपाशी हायात."

ठेकेदार तिच्याशी बोलतच होता तर गोदाम मालक डोकाल्याला हात लावत तिथे आला आणि त्याने जयाला पैसे नको देवू असं सांगितलं,

"अरे हि बाय, मले गुंडाळत होती आतमदे, कसल्या बाया कामाला लावतो रे तू?"

आणि मग रागाने जयाकडे बघत म्हणाला,

"ये पांढऱ्या पायाची अवदसा, अशीच करत असल म्हणून नवरा लाजीन डुबून मेला, पायतो म्या तुले कोण काम देते त! निघ इथून, नाहीतर देईन हाणू ऐक."

येवढ्या वेळात सर्व कामावरच्या बाया कुजबुजायला लागल्या होत्या. आणि जयाला त बघवेना झालं होतं. तिने काढता पाय घेतला. तर ट्रक चालकाने तिला थांबवलं, “कुठं चाललीस वं जया बाई.?”

“अरे दादा नशीब माझं, आता तुला काय सांगू? जावूदे घराला जातो. पोर वाट पायत असत्याल.”

“अवं म्या ओळखत होता तुह्या धन्याले, लय चांगला माणूस होता तो.”

“अजी दादा काय काम मिळल काय, पोरं घरी उपाशी हायत, शाळेच्या खिचडीवर जगत हायत जी, उपकार होतील दादा, हा मालक सांगतो तशी नाय मी.” जया डोळ्याची किनार पुसत म्हणाली.

जायचे डोळे भरून आले होते. ती गयावया करत होती, आणि तिने त्या ट्रक चालकाचे पाय धरले.

“अवं, पापं लावशीन काय मले, होय दूर.”

म्हणत तो डोक्याले हात लावत विचार करत होता.

आणि म्हणाला, “बाई एक काम हाय, तसा तुह्या धनी भी करत होता, कवा कवा, आपल्या गावातल्या मोठ्या जमिनीवरच्या वाड्यावर भाजीचं पोहचवायचं ह्या. मी जाणार होता पण तू जा आता, तिथला गडी तुले चांगले पैसे देईल....पण...”

“पण बिन काय जी...म्या जायल, भाजी नेवाची हाय ना? उपाशी पोर घरी हायत, म्या काय बिन करल बाबा, म्या जातो.”

“होय वं, पण तेथ जे बिन पायशील ते कोनलेबीन संगाच नाय त्या...नाहीतर तू वं काही खरं नाय बाई. पाय बापा ...जमल तर...”

“दादा, मले काय बीन कराच नाय कोणाच, तसचं करण म्या, मले सोडा तुमी तिकडं..”

“असं म्हणतस, बसं मग मागं.. म्या सोडतो तुले...”

मग जरा विचार करत म्हणाला, “अवं पण म्या तुले सोडल, तुवं तुले येवा लागल वापस ... तुहे वाल घर जवळ ह्या वं तेथून.”

“होय होय, हाय, उपकार झाले जी. म्या बसते मागण.”

जया ट्रक मध्ये बसली. आणि ट्रक वाल्याने गाडी शेतातल्या वाड्या कडे काढली.

वाडा आला आणि ट्रक थांबला, ट्रक वाला मागे आला आणि म्हणाला,

“बाई ह्या टोपलीत भाजीचं हाय, उचल अन जाय, कोणी विचरलं तर सांग भाजी घेवून बटाटा भाऊने बोलावलं म्हणून.”  

जया उतरली अन फाटक खोलून गेली, बंदुक धारयाने थांबवलं तिला, तर  म्हणाली, “भाजी घेवून आलो जी, बटाटा भाऊने सागितलं होतं माले.”

बंदूक वाला तिला सोबत घेवून बटाटा भाऊ कडे आला आणि म्हणाला, “बटाटा भाई ये औरत सब्जी लेकर आयी है.!”

“हा हा, ये इकडे, ठेव भाजीचं,”  बटाटा भाऊ तिला म्हणाला. आणि मग तो पैसे काढत होता तर तिला निरखून बघून म्हणाला, “तू जयंतची बायको काय वं?

“होजी, पैसे द्या मले लवकर, पोरं वाट बघत आहेत.उपाशी हायत माहे पोर, जावूद्या मले जी.” 

“हो हो देतो बसं जरा, दम घे, हे घे कोला पी, मी आलोच पैसे घेवून आतून.” म्हणत तो आतल्या खोलीत गेला.

पुढ जयासोबत काय झालं वाचूया पुढच्या भागात ....तोपर्यंत stay tune ….पुढला भाग http://www.urpanorama.com/14055/

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

Post a Comment

0 Comments