“तू कधी सुधारशील, असं वागू नये ग,
इथे आपण सर्वांसोबत राहतो ना, मग मला सांग काय होतं जरा त्यांच्या मनाप्रमाणे
वागलीस तर, तुला पसंत करतील ग. सर्वांची आवडती होवून राहशील. घ्यायचं ग समोरच्याच्या मनाने जरा, काय
बिघडतं?”
“तायडे, असलं काही वागायला सांगू
नकोस. मला
जमणार नाहीच ग.”
“अरु, जरा...मर्जी राखायला शिक काय
हे लगेच बोलून मोकळी होतेस.”
“तायडे, काय बिघडतं? कुणाचं काहीच
नाही ग... माझं बिघडेल, मला नको सांगू हे असलं वागायला...”
अरुणाची मोठी बहिण तिला ओरडून सांगत
होती. अरूणाच लग्न होवून सहा महिने झाले होते, आणि तिला आता नौकरीची ऑफर होती,
तिच्या सासरी नुसता गोंधळ होता. अरुणाने आतापर्यंत सारं कसं मस्त जमवलं होतं पण
तिचा हा निर्णय सारं काही मातीमोल करणार असं सर्वांना वाटत होतं. आज ती इकडे माहेरी आईला भेटायला
आलेली आणि आईने तातडीने आराध्यालाही बोलवून घेतलं कारण अरुणा तिच्या तायडीच ऐकत
असायची.
अरुणाने लग्नाच्या सहा महिन्याआधी
लग्न आणि सारच काही मस्त एन्जोय करता यावं म्हणून नौकरी सोडली होती. मग सासरच सारं
काही अनुभवलं तेही स्वतःच्या मर्जीने. सासूला तिचा असा मोकळा स्वभाव सुरवातीला
खटकत होता पण अरुणा मागे वळली नाही, मर्जी राखायची म्हणून तिने घरात अजूनतरी
कुणाची हाजी हाजी केली नव्हती. आणि तिच्या ह्याच स्वभावाने आता सासर बदलत होतं... हळू
हळू मन वळत होती ...आणि हे अचानक नौकरीच नवीन सर्वांसमोर आलं. आईला धाकधुक लागून
राहिली होती.
ती मधेच म्हणाली,
“अरु मुलीच्या जातीने मर्जी राखावी ग
सर्वांची. मगच आपण सर्वांचे आवडीचे होतो. अमित काय म्हणतोय, तुझी सासू काय विचार
करते, घर कसं बघशील हा सारा विचार केलास का. माहेरी नाही ग तू, कि तू तुझी मर्जी
आमच्यावर थोपून तेशील आणि आम्ही ती स्वीकारून घेवू.”
“आई, तू ना असा उगाच विचार करू नकोस.
हा असा विचार करतेस ना म्हणून तू अशी आहेस, आणि तायडीलाही तू तुझ्यासारखं केलंस.”
“तायडे, तुला कधी तुझी मर्जी दिसली
नाही काय ग? काय होतीस तू! मी माझ्या तायडीची फॅन आहे. पाटलांच्या सुनेची नाही.
तुझं मी ऐकणार नाही, आधी तू तुझं ऐक.”
“अरु, लग्न झालंय तुझं, मागचं पुढचं
सारच बदललंय ग.”
“काय! बदल हा आयुष्यात असतोच ना, मग
काय त्यात, फक्त माझच आयुष्य नाही ना बदललं, माझ्यासोबत असणाऱ्या साऱ्यांच्या
आयुष्यात बदल झालाय, त्यांनीही
तो स्वीकारावा ना? मी ठेका नाही घेतला आहे सर्वांच्या मर्जीने चालण्याचा... माझी
मी मला वाटते तसं करणार... हा आता हे नक्की बघेल कि माझ्या वागण्याने कुणाला त्रास
होवू नये. बाकी मी माझी मर्जी आधी सांभाळेल. तू बघ ग तायडे स्वतःला, दोन वर्षात
कशी झालीस. तुझं बुटिक टाकणार होतीस ना, जीजू म्हणाले होते लग्नाच्या वेळी तुला
मदत करतील म्हणून. तुझे सासरे तर जागा शोधत होते... काय बिनसलं ग, कुठे गेलं सारं
काही... एक मुलगा झाला आणि तुला आता तुझी मर्जी राहिली नाही.”
आराध्या गप्प झाली होती. लग्नानंतर
सारं बदललं हे तिच्या नजरेसमोर येत गेलं. कधी सासूला मान्य नाही हा व्यासाय तर कधी
घरात कार्य. अनेक कारण येत गेली. मनात असंख्य इच्छा असूनही तिने स्वतः मर्जी राखून
स्वतः पुढाकार घेतला नाही. तिनेही आणि आज तिलाच सासरचे पसंत करत नाहीत. सासूने
लग्नआधी डोक्यावर घेतलं होतं तर ती आता तिच्या नावाने बोंब करत फिरत असते.
सर्वांची मर्जी सांभाळत राहिली तरीही आज ती परकी राहिली होती. आपण स्वतःही स्वतःला
काही वेळ देवून मर्जीने मनमर्जी करावी हे तिला आज जाणवलं होतं. कदाचित ते केलं
असतं तर ती स्वतःसाठी तरी आनंदी राहिली असती. प्रत्येकाची मर्जी राखता राखता ती
स्वतः हरवली आणि आता घरात तिला काय किंमत होती.
अगदीच दोन दिवसाआधीचा प्रसंग, नणंदबाईला
साडी घेवून द्यायची होती, अहोही सोबत होते, मग तिलाही साडीसाठी आग्रह केला अहोने, आराध्याला
निळा रंग आवडत होता पण अहोने इशारा केला आणि तिने जांभळा रंग निवडला, काय तर अहोची
मर्जी! जांभळी साडी घालून घरात मिरवली पण मनात त्या निळ्या रेशमी साडीची मर्जी
पडून होती. मनात असूनही चेहरा आनंदला नव्हता, उलट आहोच बोलणं,
”काय ग एवढी महागाची साडी अंगावर
असूनही तुझ्या चेहऱ्यावर हे उसण हसणं का?”
मर्जी सांभाळूनही ती खुश नव्हती आणि
समोरचाही नव्हता.
आराध्याच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी
केली, आईला राहवलं नाही, तिने आराध्याला जावून मिठी मारली,
“चुकले ग मी, आजवर मी माझी मर्जी कधी
मनावर घेतली नाही आणि बघ ना तुलाही तेच बोलले, दुसऱ्यांची मर्जी राखायची म्हणजे
आपल्याला लोकं पसंत करतात असचं मी सांगत आले. पण आपण आपली आधी पसंत होण्यासाठी
आपली मर्जी राखणं महत्वाच आहे, तेव्हां समोरचा अलगत आपल्याला पसंत करतो आणि सारं
कसं बदलत जाते...
दोघीही रडत होत्या. आणि अरुणा
त्यांना येवून बिलगली,
“अरे अभीही टाईम नही गया, सुधर जावो,
नही तो आप दुसरो के मर्जी के मलिक रहोगे... हम तो भई अपने मर्जी से चेल हे,
चलेंगे... तसंही आपला एकच फंडा आहे, दुसऱ्यांची मर्जी मीचं का राखायची, मीही
दुसऱ्यांच्या आयुष्याचा भाग आहे, त्यांनाही संधी द्यावी ना माझी मर्जी
राखण्याची...”
आईने तिचा आवंढा गिळला, आणि अरुणाला
विचारत म्हणाली,
“काय ग तुझ्या सासूला सांगितलं काय?”
“हो, मी तर त्यांना घेवून गेले होते
माझ्या ऑफिससाठी ड्रेस आणि बॅग वैगेरेच्या शोप्पिंगला, गप्प होत्या, काही बोलल्या
नाही, पण मीही काहीच बोलले नाही, मी जमवून घेते आहे ना सर्वांना मग माझी मर्जीही
काही आहे कि नाही.”
“अग पण मग अमितराव, हो म्हणाले ना?”
“त्याला adjust करावं लागेल, अर्धांगिनीने निर्णय घेतला आहे मग मर्जी राखावी लागेल. पुढे
कसं आणि काय करायचं बघू. पण मी मागे वळणार
नाही, मी आता पाय मागे घेतला तर मग हा पाय पुढे कधीच जाणार नाही...जागो जागी
त्यांच्या मर्जीची सवय लागली ना कि मग आपलं कठीण होतं, एकदा सर्वाना माझी सवय अशी
लागली कि मग... आई पुढचं तुला काय सांगायचं... मी दुसऱ्याच्या मर्जीने वागणार
नाही... माझी मर्जी मी राखणार... मार्ग
निघतील, आणि मी आनंदी राहिली तर मी साऱ्यांना सामवून घेईलच मला विश्वास आहे. मनात
खुडत राहून काय दुसऱ्यांना आनंद देवू शकतो ग आपण? मला नाही बाई पसंत पडत.”
आईने आणि आराध्याने तिच्या समोर हात
जोडले, आराध्या म्हणाली,
“अरु पटलं ग, वेळ झालाय म्हणणार नाही
पण वेळेत भानावर आले, आता सावरायला वेळ लागेल पण माझी मी मर्जी नक्की राखेल ग...”
आईने फ्रीजमधून मिठाई काढून आणली, “घ्या
तोंड गोड करा, कधी जॉईन करते आहे ग मग?”
अरुने ने पेढा तोंडात भरला म्हणाली, “सोमवार
पासून..”
“अग बाई म्हणजे परवा काय ग? तुझी
तयारी झाली सगळी, अग मग घरच्यांचं कसं एवढ्या लवकर...”
“अरे! मी माझी मर्जी सांभाळली, त्यांनी
माझी सांभाळावी जरा, दुसऱ्याची मर्जी मीचं काय राखावी... जरा त्यांनाही चान्स द्यावा...”
आई आणि तायडी हसत राहिल्या, पण
बोलण्यातलं सारं काही उलगडलं होतं.
मर्जी राखणे हा आपला आपला विचार पण
का दुसऱ्यांची मर्जी राखत आयुष्य काढायचं...? बघा पटलं तर.
माझ्या नवीन कथेसाठी पेजला लाईक नक्की करा .. खाली लिंकला क्लिक करून तुम्ही पेज लाईक करू शकता. धन्यवाद!! https://www.facebook.com/manatlyatalyat/
©उर्मिला देवेन
तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोसाहन देतील
फोटो साभार गुगल
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव!
धन्यवाद!!! 🙏🙏
0 Comments