भिंगरी_“द_रिव्हेंज”_(भाग ४)



अरुण बहिणीला भूक लागू नये म्हणून तिचा अभ्यास घेत होता. बहिणीला रमवण्यात आता तो हुशार झाला होता, तिलाही कळायचं पण पर्याय काय हेही हळूहळू भावनाला समजत होतं. वयाने लहान दोघेही विचाराने मोठे झाले होते. एकमेकांच्या साथीने घरात राहायचे.

सात वर्षाच्या अरुणने समोरच्या भानू दुकानदाराला म्हणून पावं विकण्याचा व्यवसाय सुरु केला. सकाळी उठून तो पायीच पावं विकत असायचा, दहा पर्यंत पावं विकून घरी आला की भावनाला तयार करायचा आणि मग दोघेही दिवसभर शाळेत असायचे. शाळेत खिचडीने पोट भरणं आणि अभ्यासात लक्ष देणं हेच त्याचं सुरु होतं. घरी आल्यावर परत रात्री नव वाजेपर्यंत अरुण जरा दूर गल्लीतल्या दुकानात सामानाच्या पुड्या बांधत असायचा. आलेल्या पैस्याने दोघं  घरात सामान आणायचे आणि रविवारी अरुण स्वतः भात मांडायचा, बहिणीला आनंदात गोष्टी सांगत भाजी करायचा, दोघेही आकाशातल्या चांदण्या मोजत मस्त जेवण करायचे.

कोणी कपडे देत होतं तर कुणी काही. कोणी शिळ पाथ तर कुणी सनासुदीला गोड धोड अरुण गुमान सगळ ठेवून घ्याचा. कुणाशीही तो वाकड्यात जावून बोलत नव्हतं. दिवस रेटत जातं होती आणि रात्री सुखासाठी पळत होत्या. दोघेही मोठे होतं होते एकमेकांच्या आधाराने.

आता भावनाही भिंगरी खेळण्यात वस्ताद झाली होती मग टक्कर खेळायचे दोघे. अरुण आता तिला भिंगरी म्हणून चिडवत होता. दोघांच्याही मस्तीत गाणं रंगायचं “एक होती भिंगरी ...एक होती भिंगरी ..तिचं नावं झिंगरी,..तिचं नावं झिंगरी....”

आणि अरुण तिला ओरडायचा “ये झिंगरे...”

बघता बघता बहिण भाऊ मोठी झाली होती. अरुणचा पूर्ण वेळ घरं चालवण्यात जायचा मग अभ्यास होतं नव्हता त्याचा. मग तो दहावी नापास झाला आणि हाताला लागेल ते लहान मोठ्या काम करायला लागला.

तेरा वर्षाची गोरीपान भावना मात्र अभ्यासात हुशार होती. गणित तर तिचा आवडता विषय होता. पाव विकल्यानंतर तिचं हिशोब करून भानुकाकाला हिशोब द्यायची. लहान मुलांना घराच्या आवरत घेवून शाळा शाळा खेळत असायची, आता घरची कामंही ती करायची, अरुणला आता तिची मदत होतं होती. वस्तीत दोघांच सर्वाना नवल होतं. बहिण भाऊ खुखाने राहत होते. आणि वस्तीतले लोकं त्यांना लागेल तशी मदत करत असायची.

दिवसभर काम करून अरुन थकला की अंगणात दोघेही बसत असत, आणि निळ्या भोर आकाशाकडे बघून माय आणि बाबुला आठवत असत. आणि मग एखाद्या विमानाचा लाईट आकाशात दिसला की भावना खूप खुश होतं होती, अरुणला म्हणायची,

"दादा मी बसेन हा ह्यात तुझ्यासोबत ऐक दिवस... ह्या विमानांत.झु झु ......ss..झु....ss"

"हो आधी गणित कर पट पट, उद्या पासून परीक्षा हाय तुही, ह्याबीन वेळेला नंबर पहिला आनजो, मग माय तुले मुंबई पावले घेवून जाईन. घे आटूप लवकर.  म्या खिचडी आण ठेचा केलाय, घेवून यतो, मग जेवू आपुन,"

आणि परत विमानं वरून उडाल कि दोघही ओरडायची. “ये ये .....”

अरुण बहिणीसाठी नेहमी काळजीत असायचा. भावना होतीच सुंदर. वस्तीतले काही उनाड मुलं तिला चिडवत असत.

मग तिला तो एकट सोडतही नव्हता, आणि ती घरी एकटी असली की शेजारी दुकानातल्या भानू काकाला सांगून जायचा. मग काका लक्ष ठेवत असत घरावर आणि भावनावरही. त्यांचाही जीवं लागला होत्या दोघांवर. आजू बाजूचे वयस्कर मंडळी सतत आवाज देत असायचे दोघांना मग सतत कुणाचं ना कुणाचं लक्ष असायचं त्यांच्यावर.

हळूहळू अरुने काही पैसे जमवले होते, जमलेल्या पैशात अरुण आता स्वतःचा पावाचा ठेला घेणार होतं मग तो चौकात जुन्या बाजारात विचारपूस करायला गेला जाणार होता.

“भावने, आज म्या ठेला पावाले जाईन म्हणतो.”

“अरे दादा, मस्तच रे, मग आपली बिन गाडी रायल ना, म्या बिन रायत जायल उभी तुया संग. हिशोब करीन ना मी!”

“नाय नाय, तुले काय बिन गरज नाय, घरीच रावाच...मोठी आली उभी रायतो मने, अभ्यास कर, नंबर पहिला आला पाहिजे या वर्षी बिन.”

भावना नाराज झाली, तर अरुण परत तिच्या जवळ आला, “अवं माये लाडाचे भिंगरे, घरी राय वं, कायले उनीत हा तुया गोरा रंग काळवतस, येवढी सुंदर हाय माझी बाय.... हुशार हाय, जीव लावून अभ्यास कर, म्या हाय ना तुह्या साठी.”

भावना भावाला ओळखून होती, गद्कन हसली, म्हणाली, “चाय ठेवला हाय, आणतो म्या.”

अरुण घरातल्या आरश्यात स्वतःचे केसं मोठ्या रुबाबात करत होता आणि तयार होतं होता, भावनाने चहा आणला आणि अरुणने आनंदाने घेतला. भावनाची परीक्षा जवळ होती ती अभ्य्यासाला लागली, अरुण तिला निघतांना परत म्हणाला, “बाई, भावने, अभ्यास कर, सयपाक म्या करतो आल्यावर, नायतर तर म्या कायतरी आज घेवून येईन त्या सदाजी धाब्या वरून, आपली गाडी येणारं ना आज.मग कसा!...”

भावना खूप खुश झाली आणि ओसरीत पट्टी टाकून अभ्यासाला बसली, अरुणने निघतांना तिच्या डोक्यावर लाडाने हात ठेवला आणि तो निघाला. फाटक बंद करून बाहेर आला, भानू काका समोर होते. नेहमीप्रमाणे भानू काकाला भावना घरी एकटी आहे हे त्याने सांगितलं आणि लक्ष ठेवण्यासाठी आग्रह केला.

संध्याकाळ होतं आली होती भानू काका दुकान बंद करून अरुणच्या घरी बसायला जाणार होतेच तर वस्तीत गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे ह्या वर्षीही गुण्या भाईच्या गाड्या जोरात गावात शिरल्या, जो समोर येईल त्याला त्या ठोकत होत्या. वस्ती धूळमय झाली होती. आणि दरवाजे पटापट लागत होते.

भावना त्याच वेळी बाहेरचं आंगण झाडायला आली होती. समोरच्या काकाने जोरात भावनाला आवाज दिला, “भावने.... घरात हो, सोड झाडू. चल होय आतमदी.”

पण भावानाला गाड्यांच्या आवाजात ते ऐकायला आलंच नाही ती अंगण झाडत राहिली, पण बंदूक धारी गाड्यांवर उभी दिसताच ती घाबरून पडलेला झाडू उचलत आत जायला निघाली होती.

तोच गुण्या भाऊची नजर तिच्यावर पडली, तो दूर पर्यंत तिला गाडीतून तोंड काढून बघत राहिला. गाड्या धूळ उडवत निघून गेल्या. त्या धुळीतही भावना गुण्या भाईला दिसत राहिली. भावना घरात शिरली पण ती गुण्या भाईच्या काळजातही शिरली होती. तो वाड्यावर आला पण भावनाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. खोलीत येताच त्याने फेका फेक सुरु केली. 

परिस्थिती भावनाला आणि अरुणला कुठे नेवून उभं करते हे वाचूया पुढच्या भागात....खरंच त्यांना न्याय मिळेल ?

पुढचा भाग http://www.urpanorama.com/14072/

कथा कथेच्या अपडेट साठी तुम्ही माझ्या पेजलाही लाईक करू शकता.

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

फोटो साभार गुगल

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव!

Post a Comment

0 Comments