उंबरा... भाग ३
भाग १ इथे वाचा- उंबरा भाग १
भाग २ इथे वाचा-उंबरा भाग २
रमाकांत गर्दीत दिसेनासा झाला आणि गिरजा पार घाबरली. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती पण तरीही नजर तिच्या गर्दीत रमाकांतला शोधत होती. जसा तो दुरून दिसला तसं तिला हायसं झालं. तो धापा टाकत तिच्याकडे परत आला, “गिरु पैसे गेले आता... नाही सापडला तो.”
क्षणात त्याचं लक्ष तिच्या पायावर गेलं, पायाच्या बोटांमधून, रक्त वाहत होतं. त्याने धरून तिला शेजारच्या बाकावर बसवलं. पायाकडे बघताना गिरजाला तोरड्या दिसल्या. तिने तोरड्या काढून रमाकांतच्या हातात दिल्या,
“रमा, हे घे, विक आणि आण पैसे.”
“गिरु ह्या तोरड्या तुझ्या आईने मोठ्या लाडाने तुझ्यासाठी केल्या होत्या ना, शेवटची आठवण म्हणून तू ठेवणार होती.”
“आता ह्या क्षणाला हा एवढाच पर्याय आहे रमा.”
“ नाही गं, राहू दे मी बघतो काहीतरी, नाहीतर आपण असेच जाऊया तिकीट न काढता. काय होते!”
“नाही रे रमा, उगाच पकडल्या गेलो तर पोलीस मागे लागायची आणि तसही माझे वडील गप्प तर बसले नसतील. तुझ्या घरी जाऊ, लग्न करू आणि मग जे व्हायचे ते होऊ देत.”
त्याने एक तोरडी तिच्या हातात दिली, “ठेव एक, आईची आठवण तुझ्या जवळ. मी अशीच करून देईल तुला. नाहीतर हीच परत मिळवेल नंतर...”
ती तोरडी घेत म्हणाली, “ठीक आहे, जा आधी, मी इथेच ह्या बाकावर बसून आहे. इथेच ये, माझ्या पायातली चप्पल तुटली नसती आणि ही ठेच लागली नसती तर मी आले असते रे. मी वाट बघते इथेच. ये तू.”
“चल ना मी पकडतो तुला. तू असलीस की मला धीर येतो.”
“रमा, आहे मी इथे, तू जा आणि लवकर ये.”
रमाकांतने तिचे मोकळे केसं आवरत, तिच्या माथ्यावर ओठ टिपली, “इथेच बसं अजिबात जायचं नाही कुठे, मी ह्या पुढच्या चौकातून येतोच. माझी एक नजर आहे तुझ्यावर.”
ती नजर रोखून नुसती बघत बसली होती. दोन तास झाले पण रमाकांत काही आला नाही. गिरजा जागेवरून उठून त्याला शोधायलाही जाऊ शकत नव्हती. तिला भीती होती की रमाकांत तिला शोधत तिकडे येईल. पाच वाजले होते. सूर्य अस्ताला निघाला होता आणि चंद्राच्या आगमनाची तयारी नभात सुरू होती.
गिरजाच्या मनात असंख्य विचारांच्या ढगांनी गर्दी केली होती. त्या ढगांमध्येही तिला नको असलेले विचारांच्या विजा मनात काहूर वाढवत होत्या. ती कातरवेळ तिला मनातून कुरतडत होती. कासावीस ती तशीच बसून होती. आता अंधार पूर्णपणे पसरला होता. रेल्वे स्थानकावरून येणारे-जाणारे तिला तिच्याकडे वळून बघत होते. काही कुतूहलाने तर काही संशयाने बघणाऱ्या लोकांच्या नजरा तिला टाळता येत नव्हत्या. काही माणसं तर उगाच थांबून नजर शरीरावर फिरवून निघत होते. भीतीने ती अधिकच घाबरली होती. भीती पोटी आईची आठवण येत होती. मग ती आता मनातल्या मनात घरचा फोन नंबर आठवत होती, कसेबसे नंबर जुळले, समोर फोनबूथ होता. बॅगमध्ये दोन रुपये तिला मिळाले. घरी फोन करायचा, पण काय सांगणार, “मी पळून आले आणि आता रमा मला इथे सोडून गेला...”
ह्या कल्पनेने तिचे पाय मागे झाले. ती आणखी घाबरली. जाऊन परत बाकावर बसली. हातात धरून ठेवलेली एक तोरडी तिने आईच्या आठवणीत हातावर बांधली. पडल्यामुळे पाय आता चांगलाच सुजला होता आता, ठेच लागलेलं बोट ठणकत होतं, प्रत्येक ठणक्या सोबत डोळ्यात पाणी येत होते आणि आता चालता येणे शक्य नव्हते, त्यात मनात शिरणारे विचार तिला अस्वस्थ करत होते... “रमाकांतला काही झाले तर नसेल, बाबांनी त्याला जीवेमारलं तर नाही... पोलिसांनी पकडलं असेल का... नाही नाही तो येईल. मला इथेची त्याची वाट बघयाला हवी... मी की जाऊ त्याला बघायला... आणि तो इकडे आला तर...” ह्या सगळ्या विचारांनी तिचे काळीज जणू थरथरत होते. रात्रीचे नव वाजले होते. गळा कोरडा पडला होता आणि भूकही लागली होती. काहीच सुचत नव्हतं, गुमान ती बाकावर बसून होती. नजरा गर्दीत फक्त आणि फक्त रमाकांतला शोधत होत्या. प्रत्येक दुरून त्याच्या सारख्या दिसणाऱ्या माणसाकडे बघताना तिची आशा वाढायची आणि तो जवळपास आला की निराशा पदरी पडायची. हळहळू रेल्वे स्थानक रिकामं होतं चाललं होतं, लोकांची वर्दळ कमी झाली होती. बारा वाजले होते, थंडीत ती कुडकुडत होती. तिने तिच्या बॅग सह दोन्ही हात स्वतःभोवती आवळून घट्ट केले होते. जीव अक्षरश: मुठीत धरून ती फक्त रमाकांतची वाट बघत होती. तेवढ्यात कुणीतरी मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती घाबरत ओरडली,
“रमा...!”
गिरजा मागे वळली, बघते तर एक मध्यमवयीन बाई होती ती. अंगावर गडद लाल साडी, केसांचा सैल अंबाडा, चेहऱ्यावर हलका पण भडक वाटणारा मेकअप. गिरजा जरा घाबरली पण बाई माणूस समोर त्यात तिच्या डोळ्यात मायेची ओल तिला जाणवली. तशी ती बाई हळू आवाजात म्हणाली, “घोबरू नको पोरी...”
इतका वेळ भीतीने दगड झालेली गिरजा त्या मायेच्या शब्दाने तिला जशी बिलगली. आणि हमसून रडायलाच लागली. तिला प्रेमाने जवळ घेत बाई म्हणाली, “रडू नको पोरी... धीर धर... काय झालं सांग त...?”
ती तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करत होती, रामाने थरथरत सगळं तिला आतापर्यंत घडलेलं सांगितलं. तिने तिचं सर्व ऐकून घेतलं. मग तिने जवळचा डबा उघडला, आणि तिचे अश्रू पुसले, “घे, आधी दोन घास खा.” गिरजाला भूक तर लागली होती, पण घास गळ्याखाली उतरत नव्हता. तरी तिने खाल्लं.
“काय नाव काय त्या पोराचं? कसा दिसतो? मी येते जरा बघून.” तिला दिलासा देत ती रमाकांतला शोधायला गेली. ती सुद्धा बराच वेळ परतली नव्हती. दोन वाजायला आले होते. ती बाई परत आली, तेव्हा तिच्या सोबत अजून दोन बायका होत्या. त्याही प्रेमळ बोलत होत्या. त्या तिला ‘अम्मा’ म्हणत होत्या. ती बाई गिरजाला म्हणाली,
“मला वाटतं तो मुलगा तुला सोडून गेला.”
ते ऐकून गिरजाच्या छातीत धस्स झालं. “नाही… नाही… तसं नाही…”
“अगं बाई, मी शोधून आली न. सोन्याच्या पेठेत, स्टेशनच्या बाजूला, चौकात… कुठेच दिसला नाही. असा कुठलाच मुलगा नाही दिसला. उद्या हवं तर तू स्वतः जा, चौकशी कर. पण आता पहाट व्हायला आली. इथे थांबणं बरं नाही पोरी. चल माझ्यासोबत घरी. सकाळी जाऊन शोधू त्याला.”
गिरजा आधीच घाबरली होती. जराश्या प्रेमाच्या शब्दाने ती विरघळली आणि त्या बाईच्या सोबत निघाली. धास्तावलेल्या गिरजाला ती त्या बाईसोबत कुठे जात होती हेही तिला कळत नव्हते. ती नुसती त्या बाईचा हात धरून चालत होती, पाय दुखत होता, मन कोसळलं होतं, डोकं सुन्न झालं होतं. ती बाई तिला एका जुन्या, अंधाऱ्या वाड्यासारख्या घरात घेऊन आली, “इथे पड. कर आराम. सकाळी बघू.”
दोन दिवस झाले होते, ती बाई खोलीत आली नाही की तिने तिला कुठेच नेलं नाही. एका खोलीत ती पडून होती, ती आवाज देत राहिली पण कुणी उत्तर देत नव्हतं. बाहेरून नुसतं कुजबुजणं, हसणं, पुरुषांचे दबके आवाज... शिवीगाळ... अजूनही काहीतरी विचित्र ऐकायला तिला यायचं. दारं उघडायची, बंद व्हायची. दिवसा भयाण शांतात आणि रात्री झगमग दुनिया तिला त्या खोलीत जाणवत होती. शेवटी गिरजाच्या काही गोष्टी लक्षात आल्या, अंगावर अक्षरशः काटा आला.
कसही करून इथून निघायचं आणि जळगाव गाठायचं असं तिने ठरवलं. रात्री चेहलपहल सुरु झाली आणि कुणीतरी तिच्या दाराची कडी उघडून ठेवली होती. ती हळूच तिथून निघाली, गल्लीबोळ ओलांडत, धापा टाकत, जीव मुठीत धरून ती रेल्वे स्थानकावर पोहोचली. आज तिकडे पोलीस होते, खाकी वर्दी दिसताच तिचे पाय थबकले. एका मनाने तिला पोलीसांकडे जाण्याचा इशारा केला पण दुसर्या मनाने तिला थांबवलं. मनातल्या मनात सुरू असलेल्या युद्धात तिचा पराभव झाला होता. तेवढ्यात समोर तिला अम्माची माणसं दिसली.
दोन बायका… आणि त्यांच्यासोबत एक धिप्पाड गडी. ते तिच्याकडेच बघत उभे होते. गिरजाच्या पोटात गोळा आला. तेवढ्यात एकीने तिचे हात घट्ट पकडले, दुसरीने तोंडात बोळा कुचकला आणि गाडीत कोंबलं. ती परत त्या खोलीत आली, ओक्साबोक्शी रडत राहिली.
स्वतःलाच मिठी मारून ओरडत राहिली, “रमाकांत… असं नाही ना केलंस तू? रमा कुठे आहेस तू?”
बराच वेळाने दार उघडलं, अम्मा रागात आत आली, “अबे पोट्टे, कायले आरडाओरडा करतं, धंद्याचा टाईम आहे. फालतू वर्दी वाले आवाजानं आले ना त वाट लागलं...”
तश्या तिने दोन तिच्या गालफटात लावल्या, गिरजा जमिनीवर पडली. अम्माचं खरं रूप गिरजा बघत होती, तिने पानं थूकलं आणि म्हणाली, “ए भवाने, खूप झालं तुझं नाटक, तो रमाकांत तुला सोडून गेला आहे.”
“नाही…” गिरजाने तशीच पडल्या पडल्या बोलली.
आणि अम्मा चिडली, “पागल है क्या तू रे? एवढं समजत नाही तुला, त्याने मजा केली, मजा... आणि आता तू काही त्याच्या कामाची नसल्याने तो निघून गेला त्याच्या घरी.”
गिरजाने कानांवर हात ठेवले, “नाही… नाही… खोटं आहे… रमा नाही असा.”
अम्मा मिश्कील हसली, “मी माहिती काढली आहे, तो मुलगा त्याच्या घरी सुखरूप आहे.”
प्रत्येक शब्द गिरजाच्या छातीत खंजीरासारखा घुसत होता. एक एक क्षण जणू तिच्याशी गद्दारी करत होता.
अम्माने गडी माणसाला हाक मारली, आणि रमाकांतचे वडिलासोबतचे फोटो तिला दाखवले. गिरजा अक्षरशः कोसळली.
“नाही… नाही… असं नाही होऊ शकत…” ती जमिनीवर बसत रडू लागली.
क्षणात अम्मा पुढे आली. तिने गिरजाचा गळा धरून तिचा चेहरा वर उचलला. ओरडत म्हणाली,
“जमीनदाराचा पोरगा हाय तो! तुझ्यासारख्या छप्पन पोरी वापरून उभा राहीन.. तुला काय वाटलं? खरंच घरी नेणार होता तुला? बायको बनवणार होता?”
गिरजाचे डोळे भरून वाहत होते. अम्मा तिच्याकडे तुच्छतेने बघत म्हणाली, “तुझ्यात हाय काय गं एवढं? ही चमडी? अशी?”
तिने तिच्या गालाला हात लावून झटका दिला.
“ना गोरी, ना काळी… ना नाकात दम, ना डोळ्यात जादू… काय हिरोईन व्हायला निघाली होती त्याच्यासोबत?”
गिरजा हुंदके देत होती. “कशाला मरायला आली होती त्याच्या मागं? आता जा ना… जा घरी!”
अम्मा उपहासाने हसली. “कुठल्या तोंडानं जाणार आहेस?”
अम्मा अजून जवळ आली. आता मात्र तिने शेवटचा विषाचा घोट पाजला, म्हणाली, “तुझ्या बापानं तर गावात तू मेली असं जाहीर केलं आहे.”
खोटं…!”
“खोटं? अगं, पोलीसातही गेले नाहीत ते. काय सांगितलं कुणास ठाऊक तुझ्या त्या होणाऱ्या नवऱ्याला… तुझ्या लहान बहिणीचं लगन आहे ह्या शुक्रवारी.”
अम्माने गडीच्या हातातून लग्नाची पत्रिका हिसकावून घेतली आणि गिरजाच्या समोर फेकली.
“ही बघ, आज हळद असेल तिची.”
अम्मा खोलीतून निघून गेली. गिरजाने थरथरत ती पत्रिका उचलली. काही क्षणात तिच्या हातातून पत्रिका निसटली आणि ती ती तशीच मागे कोसळली.
बेशुद्ध....
---- शेवटचा भाग लवकरच...धन्यवाद !!
कथा कशी वाटली नक्की कळवा!
लेखाच्या/कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७

0 Comments